Search This Blog

Saturday, September 12, 2020

विदर्भातील कोरडवाहू शेती आणि मानसिकता…

महाराष्ट्रातील शेती शेतकरी या दोन गोष्टींवर चर्चा झाली, की पश्चिम महाराष्ट्र नेहमीच विदर्भापेक्षा सरस ठरतो. कारण, तेथील शेती ही आपल्या शेतक-याला सधन करुन सोडते आणि शेतकरी सुध्दा आपल्या शेतीची पुरेपूर काळजी उपयोग घेऊन आपले दैनंदीन जिवनमान उंचावतो. परंतू, विदर्भात मात्र हे चित्र पहावयास मिळत नाही, याउलट येथील शेतकरी जलसिंचनाच्या अभावी शेतीकर्जाने दिवर्सेदिवस ढासळूत असून, गत काही वर्षापासून आत्महत्येच्या मार्गाने वळतो आहे. महाराष्ट्र हे एकच राज्य आणि राज्यातील वेगवेगळया प्रदेशांचा विकास आराखडा अभ्यासल्यास साम्य कोठेही आढळत नाही आणि ते लपवण्यासाठी आपण लगेच म्हणतो, भौगोलिक दृष्ट्यांचाच तो विरोधाभास, त्यात शेतकरी किवा इतर कोणी काय करणार? हे सर्व मान्य आहे, परंतु ह्या सर्व गोष्टींमुळेच का विदर्भाची अशी दयनीय अवस्था आज दिसत आहे, का त्यामागे आणखी काही कारणे आहेत जी आज आपल्याला शोधण्याची नितांत गरज आहे.

राज्यातील विविध प्रदेशांचा विचार केला असता, सर्वाधीक वेगळेपणा दिसून येतो तो येथे पडणारा पाऊस आणि शेती सिंचनाची उपलब्धता. कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात सरासरी पाऊस कमी पडतो आणि सिंचनाची उपलब्धता देखील कमीच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेती ही तेथे उपलब्ध असलेल्या सिंचन व्यवस्थमुळे असल्याने परिणामी तेथील शेती मालाचे उत्पादन हे इतर प्रदेश विदर्भाच्या तुलनेत जास्त आहे. तर याउलट विदर्भाची जवळ जवळ सर्व शेती ही मुबलक सिंचना अभावी सर्वातोपरी पावसावर अवलंबून आहे, ज्यामुळे येथील उत्पादन देखील पावसासारखे भगवान भरोसेच कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला.

संशोधन आणि अभ्यास यामधून असे लक्षात आले की विदर्भामध्ये नैसगिक साधनसंपत्ती पुरेपुर असून देखील राजकीय मानसिकता, शेतक-यांची सामाजिक आणि आर्थिक विषमता, शैक्षणिक मागासलेपणा, सिंचनाच्या अपु-या सोयीसुविधा यासर्व गोष्टीमुळे शेतीच्या उत्पादनात येथील शेतक-यांच्या विकासात अनिश्चितता निर्माण झाली आहे. विदर्भातील शेतक-यांच्या विकासावर राजकीय संशोधनिक गांभीर्य वेळीच निर्माण होणे गरजेचे आहे, अन्यथा येथील शेतकरी अधिक काळोखात गुरफटत राहील परिस्थितीची फक्त चर्चा करण्याशिवाय आपल्या हाती काहीच राहणार नाही.

विदर्भामध्ये कापुस हे महत्त्वाचे नगदी पीक घेतले जाते. जवळपास आठ ते अकरा जिल्हयात कापूस माठया प्रमाणात पिकवला जातो. कापुस हा पाठीचा कणा म्हणून अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, बुलढाणा या जिल्हयात ओळखला जातो. विदर्भामध्ये १२ लाख हेक्टर जमिन ही कापूस पिकाखाली आहे परंतू ४००-६०० मीमी या प्रमाणात पडणारा कमी पाऊस, सिंचनाची कमी उपलब्धता मातीमधील अन्न-द्रव्याची कमतरता, किटकांचा प्रादुरर्भाव आणि आणखी काही भौगोलिक भौतिक कारणे यामुळे कापुस या पिकाची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. विदर्भामध्ये महाराष्ट्राच्या कापुस उत्पादनाच्या १५% कमी उत्पादकता तर देशाच्या ४६% कमी उत्पादकता आज निर्माण झालेली आहे. तसेच, जास्तीत जास्त बी.टी. वाणाचा शेतक-यांकडून होणारा वापर, बी.टी. हे कमी पावसाला अती संवेदनशील असल्याने उत्पादन कमी होण्याची शक्यता आणखी वाढत आहे. 

विदर्भामध्ये फक्त ८-१० % कापुस जमीन ही चांगल्या ओलिताखाली आहे. नैसर्गिक पाण्याची साधने व पडणारा पाऊस साठवून ठेवून जवळपास सर्व कापूस जमीन ही ओलिताखाली आणणे गरजेचे आहे. संपूर्ण विदर्भामध्ये पडणा-या पावसाच्या जवळपास १५-२०% पाणी हे कापुस पिकाखाली असलेल्या जमिनीवर पडतो व वाहून जातो. त्याचबरोबर कुठल्याही मोठया-मोठया नदया विदर्भातून वाहत नाहीत म्हणून पडणा-या पावसाचे योग्य नियोजन हा एकमात्र मार्ग आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपुर्ण वर्षभराच्या मान्सुनचे पाणी मुरवणे व साठवून ठेवणे आवश्यक आहे. हे सर्व आपण पाणलोट क्षेत्र विकास, पाणी साठवण कार्यक्रम, कमी खर्चात धरणे, बंधारे शेतक-यांना बांधून देणे, इत्यादी कार्यक्रमांद्वारे साध्य करु शकतो. तसेच, पावसाचे पाणी वाचवण्याचा दूसरा उपाय म्हणजे पाऊसाचे पाणी वाहुन न जाऊ देता मातीत मुरवणे आणि दुसरे म्हणजे मातीत साठवून ठेवणे त्यामुळे मातीचा ओलावा टिकून राहतो, जमिनीतील पाण्याची पातळी वाढते व पाणी देण्याची गरज कमी भासते अशा प्रकारे आपण पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून सिंचनाची उपलब्धता निर्माण करु शकतो.

या काळोखातून वर येण्यासाठी, या सर्व बाबींवर मात करण्यासाठी सरकारी तसेच खाजगी योजना आखल्या गेल्या आहेत. उदा. (VIIDP, RKVY, MNREGS, IWMP, ISOPOM, NHM, MMA इत्यादी) VIIDP (Vidarbha Intensive Irrigation Development Program) ‍हा कार्यक्रम बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, गडचिरोली आणि भंडारा या जिल्हयामध्ये राबवण्यात आला आहे. जवळपास १००० हेक्टर जमिनी कापूस पिकाखालील या र्काक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.

VIIDP चा महत्त्वाचा उद्देश विदर्भामध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवणे त्याचबरोबर सिचणा-या सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, कापसाचे उत्पादन वाढवणे आणि वेगवेगळ्या पिकाचे नियोजन करणे, जास्तीत जास्त शेती ही कापूस पिकाखाली आणणे, त्याला पाणी पुरवठा करणे, जमिनीचा ओलावा टिकवून ठेवणे, पावसाचे पाणी साठवून त्यातून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन देणे, तसेच तुषार आणि ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढवणे हा आहे. त्याचबरोबर, विदर्भातील एकमेव कृषी विद्यापीठ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ) येथे सुध्दा कापूस व पावसाच्या पाण्याचे नियोजन त्यामुळे या सर्व गोष्टीवरअभ्यास व संशोधन झाले व सुरु आहे. परंतु, विदर्भातील शेतकऱ्याची परिस्थिती काही बदलत नाही कारण, या सर्व गोष्टीला विदर्भाचा शेतकरी वर्ग जागरुक नाही, कृषी विद्यापीठात झालेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचायला पाहिजे त्या प्रमाणात पोहचू शकत नाही आणि सरकारच्या योजना कृषी खात्यातील काम करणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त निवडक शेतकरी वगळता इतर शेतक-यांना माहिती सुध्दा होत नाहीत, याउलट परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पहायला मिळते.

पश्चिम महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ हे आपले संशोधन शेतक-यांच्या शेतापर्यंत पोहचवत आहेत. त्याचबरोबर कृषी विभागाच्या सर्व योजना तेथे राबवल्या जातात सर्वात महत्त्वाच म्हणजे येथील शेतकरी वर्ग हा जागरुक आहे. तसेच, शेतकरी व कृषी विद्यापीठे यांचा चांगला समन्वय येथे आपल्याला पाहायला मिळतो. नवीन-नवीन योजनांचा फायदा घेऊन तसेच नवीन-नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवून तेथील शेतकरी त्याचा प्रयोग सर्वतोपरी करतात आणि यशस्वी होतात व आपली यशोगाथा आपल्या शेतकरी मित्राला सांगुन त्याला सुध्दा आपल्याबरोबर सधन करतात. परंतु, विदर्भाचा बळीराजा मात्र या सर्व गोष्टींपासून वंचित राहतो कुठल्याही गोष्टीची नवीन कुतूहलता त्याला वाटत नाही, वाटली तरी शेतकरी एकमेकांबरोबर चर्चा करत नाहीत. तसेच, एकजूटीने नवीन योजना विदर्भात राबविण्याकरीता सरकारला आग्रही राहत नाहीत. त्यामुळे विदर्भाची परिस्थिती जशीच्या तशीच राहत आहे.

विदर्भातील शेती पावसाच्या पाण्याने कोरडी ठेवलीच आहे पण शेतकरी देखील आपल्या प्रयत्नांने ती ओलिताखाली आणू इच्छित नाहीत. कारण, विदर्भातील शेती तर कोरडवाहू आहेच सोबत येथील मानसिकता देखील कोरडवाहूच बनत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शेतक-यांना आत्महत्याच करावी लागणार. काळ बदलला आहे, वेळ बदलली आहे, काळाप्रमाणे बदलतो तो टिकतो, नाहीतर मागे पडतो, म्हणून उठा माझ्या बळीराजांनो पेटून उठा. तुमच्या जवळ जी काळी कसदार जमीन आहे ती अवघ्या महाराष्ट्रात शोधून मिळणार नाही .काय झालं पाऊस कमी पडला किंवा जास्त पडला. सोनं पिकवणारी जमीन आहे तुमच्याकडे. म्हणतात प्रयत्नाने परमेश्वर मिळवता येतो आणि आपला परमेश्वर आपलं पिक आहे जे आपलं कुटुंब पोसण्याची टाकत ठेवतो. चला आता आपण सुध्दा जागे होऊ, सर्वांगाने डोळे उघडे ठेवून बघू या जगाकडै आणि बदलणा-या निसर्गाकडे, चालकासारखे सुगाव घेऊ या नवनवीन शेतीवरील संशोधनाचा, माहिती तंत्रज्ञानाचा आणि नवनविन सहकारी योजनांचा. आपणही या सर्वांचा पुरेपुर फायदा घेऊ, सोन पिकवू आणि सधन बनवूया स्वत:ला देशालाही. विसरु नका याच -हाडी मातीने भारताला पहिला कृषी मंत्री दिला, याच मातीने हरित क्रांतीचा जनक दिला आहे, त्यांच्याच स्वप्नांना साकार करु, चला संकट पछाडण्याआधी आपण संकटांना पछाडू.

-रानमोती / Ranmoti 

VIIDP  वरील शोध निबंधाच्या अनुषंगाने दिनांक २३-ऑगस्ट-२०१३ रोजी प्रकाशित झालेल्या लेखाचे पुनः प्रकाशन (http://agricoop.nic.in/sites/default/files/VIIDP.pdf) 

2 comments:

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts