Search This Blog

Saturday, June 27, 2020

वारी - परंपरा तीच रस्ता नवा


वारी ही अनेक शतकांपासून चालत आलेली धार्मिक, सांस्कृतिक आणि काही प्रमाणात भावनिक परंपरा आहे, जी बदलत्या काळानुसार देखील आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात तशीच जपलेली आहे. विठ्ठल हे महाराष्ट्राचं आद्य दैवत. परंतु तसा तो गोर गरिबांचा दिन दुबळ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. वारी या शब्दाकडे बघण्याचे दोन ठळक दृष्टिकोन आपल्याला सहज लोकमानसात बघायला मिळतील. एक म्हणजे तो वर्ग आहे जो आधुनिकतेच्या आणि प्रबोधनाच्या वाटचालीकडे वळू पाहतो व त्याच्या नजरेतून वारी ही कदाचित भोळी श्रद्धा आणि प्रदूषणाची एक लहर असू शकते. तर दुसऱ्या बाजूने एक वर्ग आहे जो आधुनिकतेला हळूहळू आत्मसात करणारा परंतु वारी ही त्याचा ‘जीव की प्राण’. ज्यामध्ये आपली संस्कृती, आपली माणसं आणि प्रत्यक्षात कधीही न दिसणाऱ्या पण एका वेगळ्याच काल्पनिक उच्च कोटीच्या भावनिक श्रद्धेने वारीच्या गर्दीत विठ्ठलाला शोधणाऱ्या ग्रामीण भागातील वर्गाचा समावेश होतो. काही तुरळक जनता अशीही असेल ज्यांना वारी तर हवी परंतु प्रदूषण किंवा आंधळा विश्वास नको अशी म्हणणारी. या सर्व घटकांचा एक सुवर्णमध्य काढण्याचा विचार आपण या लेखात पाहुयात.

चला तर मग वारीचे थोडे विश्लेषण करूया;
साधारणतः वारीला जाणारा जो वारकरी संप्रदाय आहे तो ग्रामीण भागातील आहे, असं पूर्णपणे म्हणता येणार नाही. कारण मुंबई, पुणे व पर राज्यांसहित परदेशातील भाविक मंडळीही वारीत सहभागी होत असल्याचे आपल्याला ठाऊक आहे. खूप नाही परंतु शहरी भागातील भाविकांचा सहभाग ग्रामीण भागातील भाविकांपेक्षा थोडा कमीच असतो. हे विश्लेषण या करीता, कारण वारीचा जो नवा रस्ता आपण बांधणार आहोत, त्यात यांचा सहभाग फार मोठा असणार आहे. वर्षानुवर्षे वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या वाढतांना आपण वृत्त वाहिन्यांवर ऐकत आणि बघत सुद्धा असतो. प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवते एखाद्या चांगल्या व परिवर्तनवादी सुरवातीसाठी जनमाणसं एकत्र जमविणे फार कठीण आहे. आपलं हे कठीण काम विठ्ठल त्याच्या वारीच्या रूपातून कित्येक वर्षांपासून पूर्ण करीत आहे, फक्त गरज आहे ते आपण जाणण्याची. दरवर्षी पंढरपूरला जाण्यासाठी भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो रस्त्यांवरून पैदल प्रवास करून येत असतात आणि या प्रवासा दरम्यान हे भाविक ठिकठिकाणी मुक्काम देखील करतात. त्यांच्या ह्याच पद्धतीचा वापर आपण प्रबोधन आणि ज्ञान संवर्धनासाठी करायला पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी वर्ग, शहरी भागातील सामान्य मजूर वर्ग आणि देश विदेशातील आपल्याकडील सर्व सुख सोयीचा त्याग करून मन:शांतीसाठी आलेला परदेशी वर्ग एकंदरीत वारकरी हा आपला जमाव असणार आहे.
 
पंढरपूरला जाणारे सारे रस्ते ज्या ज्या मार्गाने वारकरी पंढरी गाठतो ते सर्व आपल्या ज्ञान संवर्धनाचे प्रभोधनाचे व आधुनिक जगाचा स्वीकार करण्याचे मार्ग ठरू शकतील. जसे की अनेक शेतकरी आत्महत्येला बळी पडतात, अश्या शेतकरी वर्गाला वारीच्या माध्यमातून जागोजागी कृषी प्रदर्शन्या भरवून शेतकऱ्यांसाठी शासनाने कोण-कोणत्या योजना आखल्या, त्यांचा फायदा कसा घ्यायचा याची इत्यंभूत माहिती तथा आधुनिक तंत्रज्ञानाला अवगत करून मार्गदर्शन करून देण्याची सोय उपलब्ध करून देता येईल. त्याच बरोबर वारकऱ्यांचा जिथे जिथे मुक्काम किंवा थांबा असतो अश्या ठिकाणी ग्रामीण भागातील लघु उद्योगांना, बचत गटांना, शेतकऱ्यांच्या समूहाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आपले स्टॉल उभारणीसाठी शासनाच्या किंवा खाजगी सहभागातून मदत करता येईल. देवाच्या दानपेटीत मोकळ्या हातांनी दान करणाऱ्या श्रीमंत वर्गाचा सहभाग देखील या वारीचा रस्ता दुरुस्ती तथा सुशोभीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी घेता येईल. ज्यामधून एक सामाजिक सलोखा तयार होऊन गरीबी व श्रीमंतीची दरी थोडी कमी होण्यास मदत होईल. हे सर्व करीत असतांना शहरी भागातील सामाजिक संस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा राहणार असल्याने गाव किंवा तालुका पातळीवर त्यांचे दायित्व निर्धारित करून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विकासात्मक कार्यात त्यांचा सहभाग वाढवता येईल.
 
विठ्ठलाच्या दारी पोहचेपर्यंत वरिल बाबींचा अवलंब केल्यास प्रत्येक वारकरी हा ज्ञानाने आणि माहितीने समृद्ध झालेला असेल. ज्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्राची समृद्धी, दबदबा हा तेथील लोकांच्या वागणुकीवरून ठरत असतो व त्या करिता त्या क्षेत्रातील प्रत्यक माणूस हा प्रशिक्षणाने व शिस्तीने तयार केला जातो. त्याचप्रमाणे जर आपण विठ्ठलाला आपलं महाराष्ट्राचं आद्य दैवत आणि वारीला आपली संस्कृती मानत असू तर तेथे जाणारा प्रत्येक वारकरी ज्ञानाने संप्पन, कर्तबगारीने समृद्ध आणि सामाजिक जाणिवांनी व स्वछतेच्या सवयीने प्रशिक्षित केलाच पाहिजे. म्हणूनच विठ्ठलाचं घर व तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग आपण ज्ञान संवर्धनाचे, सामाजिक बांधिलकीचे, विकासाचे व स्वच्छतेचे प्रतीक बनविले पाहिजे जेणेकरून ‘एक समृद्ध देवस्थान एक समृद्ध महाराष्ट्र’ अधोरेखित करेल. जेव्हा विठ्ठलाचे हे लाडके वारकरी त्याच्या गळाभेटीला समोर उभे ठाकतील तेव्हा त्यांच्या मुखावर प्रसन्नता आणि समाधान असेल आणि ते बघून विठ्ठलही अंतर्भावातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि वारीच्या संस्कृतीला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देईल. 

- राणी अमोल मोरे


(आजचा लेख भविष्यातील लघुकथा)

6 comments:

  1. Very good indeed. This is really needed in Maharashtra where the picture of farmers and rural livelihood is worse as compared to urban one. Madam, Keep writing further on this topic.

    ReplyDelete
  2. वारीच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या भाविकांचे प्रबोधन व्हावे म्हणून सुचविलेला उत्तम कार्यक्रम. या सर्व गोष्टींना प्राधान्य देणे खरंच गरजेचे आहे.

    ReplyDelete
  3. Varichya nimitane shetkari varg vithurayala apale grarane sangayla yeti, v that un marg milodi ashi PRA than a karto. Ya yatremadhe thikthikani Vishmukth shetichi mahithi dyavi varil Subhash palekar (zero budget) natural farming jene karun shetkaryala karj kadnyachi garajach nahi, ani sarvana gosh mukth Anna Mikel v apali rog pratikar shati vadhel. Majha shetkari punha akada sukhi hohil. Madam apalyala khup Subhecha. Chan lihitat.

    ReplyDelete
  4. Varichya nimitane shetkari varg vithurayala apale grarane sangayla yeti, v that un marg milodi ashi PRA than a karto. Ya yatremadhe thikthikani Vishmukth shetichi mahithi dyavi varil Subhash palekar (zero budget) natural farming jene karun shetkaryala karj kadnyachi garajach nahi, ani sarvana gosh mukth Anna Mikel v apali rog pratikar shati vadhel. Majha shetkari punha akada sukhi hohil. Madam apalyala khup Subhecha. Chan lihitat.

    ReplyDelete
  5. Varichya nimitane shetkari varg vithurayala apale grarane sangayla yeto. v tyatun marg milodi ashi prarthana karto. Ya yatremadhe thikthikani Vishmukth shetichi mahithi dyavi.Subhash palekar (zero budget) natural farming jene karun shetkaryala karj kadnyachi garajach nahi, ani sarvana vish mukth Anna Mikel v apali rog pratikar shati vadhel. Majha shetkari punha akada sukhi hohil. Madam apalyala khup Subhecha. Chan lihitat.

    ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts